स्नेहसंमेलनाला
लाभली देशभक्तीची किनार
श्री. विष्णू जानू ढेबे.
जि.प. प्राथ. शाळा – चिखली
ता . – महाबळेश्वर,जि. सातारा.
मोबाइल नंबर – 7588686065.
शाळा समाजमय होणे, समाज शाळामय होणे व दोन्ही शिक्षणमय होणे , हेच खरे शिक्षणाचे यश आहे . यासाठी प्रत्येक शाळा शाळांमध्ये विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळा व समाज एकरूप होऊन गुणवत्तेचे गीत गात असतात. विविध उपक्रमापैकी विध्यार्थी स्नेह संमेलन म्हणजेच शाळेचा समजासमोर मांडलेला आरसाच म्हटला पाहिजे.
दरवर्षी आमच्या जि प प्राथमिक शाळा – चिखली ,तालुका - महाबळेश्वर येथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले जाते . अगदी कमी पटाची म्हणजेच पहिली ते सातवी एकूण पट पंचवीस , त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे म्हणजे खरोखर तारेवरची कसरत. शाळेतील सर्वच विध्यार्थी यामध्ये सहभागी करून काही मुलांना चार ते पाच गाण्यामध्ये समावेश करून कार्यक्रम नियोजनाबद्दल करणे म्हणजे खरे कौशल्याच असते. फेब्रुवारी महिन्यामध्ये याही वर्षी ते अतिशय सुंदर स्वरुपात साजरे झाले. दरवर्षी एखादी थीम वापरुन विविध गीतांचे, प्रसंगाचे, सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो . या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता. यामध्ये भारतीय सैन्यातील चाळीसहून अधिक जवान शहीद झाले होते. त्यामुळे स्नेह संमेलन करावे की न करावे असा प्रश्न होता. कारण समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये या दहशतवादी हल्ल्याचा निषेध होत होता. सर्वांच्या मनामध्ये या भ्याड हल्ल्याने चीड निर्माण झाली होती. शाळेतील विद्ध्यर्थ्यांना ही खंत बोलून दाखवल्यावर मुलांनी या वर्षी सर्वच गाणी सैनिकांच्या जीवनावर सादर करून सैनिकाना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा संकल्प मनात केला. त्यानुसार तयारी सुरू झाली. पंधरा गाण्यांपैकी पाच ते सहा गाणी फक्त सैनिकांच्या जीवनावरील तसेच देशभक्ती गीते म्हणून निवडली. विध्यार्थ्यानी अतिशय कमीत कमी वेळेत निवडलेल्या गाण्यांवर सराव केला. अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी आमच्या शाळेचे स्नेहसंमेलन सायंकाळी ‘वीर जवान तुझे सलाम ‘ ही थीम वापरुन संपन्न झाले. सुरूवातीला पुलवामा येथील शहीद सैनिकांच्या कार्याविषयी चित्रफीत प्रोजेक्टर वर दाखवण्यात आली,सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . विद्यार्थ्यांनी
अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध प्रत्येक गीताचे सादरीकरण केले. कर चले हम फिदा, माँ
तुझे सलाम, सुनो गौरसे दुनियवालो, यांसारख्या गीतांचे सुंदर सादरीकरण
विद्यार्थ्यांनी केले. प्रत्येक गीतांनंतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर
घोषणा देत होते हेच कार्यक्रमाचे यश म्हणता येईल .
कार्यक्रमाच्या मध्यंतराला शाळेने वर्षभर राबविलेल्या उपक्रमाची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सर्वांसमोर पडद्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आले.शाळेमध्ये बरेच उपक्रम राबवले जातात, परंतु ते सर्वच पालक व समाजापर्यंत पोहचताच असे नाही. पीपीटी सादरीकरणातून वर्षभरातील सर्वच उपक्रम सर्वांसमोर मांडता आले. सर्व पालक व मान्यवर मंडळींनी उपक्रमांचे कौतुक केले.विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालांमध्ये ही देशाविषयी गौरवाची चारोळी व इतर माहिती सांगण्यात येत होती. त्यामुळे सर्वत्र देशभक्तिमय वातावरण झाले होते. स्नेहसंमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाल्यानंतर भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर निनादुन गेला होता.
स्नेहसंमेलनामध्ये कार्यक्रमातून साधारण दहा हजार रुपये शैक्षणिक उठाव म्हणून रक्कम प्राप्त झाली होती. त्यापैकि दहा टक्के म्हणजे एक हजार रुपये गृह मंत्रालय ,भारत सरकारच्या वेब पोर्टलवर शहीद जवानांना मदत म्हणून ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आली. त्याचे सुंदर प्रमाणपत्रही शाळेला प्राप्त झाले. फक्त घोषणा देऊन देशभक्ती दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष सैनिकांना मदत देऊन विद्यार्थ्यानी देशभक्तीच पाऊल टाकले होते. पाठ्यपुस्तकांमधून घेतलेले देशभक्तीची धडे प्रत्यक्ष काही प्रमाणात आचरणात आणण्याची संधी व सैनिकांविषयी मनामध्ये निर्माण झालेली उच्च भावना या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या व समजाच्या मनामध्ये रुजविन्यास आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो होतो.
सोबत -- सैनिकांना केलेल्या मदतीबाबत भारत सरकारने शाळेला पाठवलेले आभार पत्र जोडले आहे.